ठप्प...चहाचे दोन ग्लास ठेऊन रामा निघून गेला. रामा आमच्या College चा Canteen वाला. चहा बनवण्यात पटाईत. मी त्याच Regular गिऱ्हाईक होतो त्यामुळे मी एकटा असून सुद्धा दोन ग्लास चहा का मागवतो हे त्याला माहिती असावं. खरंतर दोन ग्लास समोर ठेऊन एक एक करून पिणे ही माझी जुनी खोड. आमचे आजोबा म्हणायचे चहा कधीही एकटा प्यायचा नाही. कधी समोरच्या माणसाला तर कधी समोरच्या आपल्या वाट्याला आलेल्या शांततेला सोबती बनवून प्यायचा. मग तो चहा नक्कीच जिभेवर रेंगाळतो. एव्हाना मी एक ग्लास संपवून दुसऱ्याला तोंड लावत होतो. स्वतःच्या आयुष्याबद्दल फार विचार न करणारा मी आज मात्र चहाबद्दल भरपूर विचार करत बसलो होतो. कधीतरी कानावरून गेलेलं एक वाक्य याक्षणी आठवलं. “कॉफी म्हणजे प्रेम आणि चहा म्हणजे आयुष्य...” खरंच चहा म्हणजे आयुष्यचं नाही का...? निर्मळ पाण्यासारख्या आयुष्यात कधी कडू चहापावडर पडते मग त्याला गोडवा येण्यासाठी साखर टाकावी लागते आणि मग आपण नुसतच पाण्यासारखं जगलो नाही एवढ चारचौघात दिसावं आणि आपला काळपटपणा दूर व्हावा म्हणून दुधाने त्याला मस्त रंग आणावा लागतो. कितीतरी कौतुक करून घेतलंय या चहाने स्वतःच. काहींनी तर समुद्रमंथनातून निघालेल्या १४ रत्नांमध्ये त्याची गणना केलीये. १३ रत्नांनंतर समुद्रमंथनातून बाहेर आलेलं चौदावं रत्न म्हणून. असो , वेळ बदलली...काळ सरला पण चहा मात्र चहा च राहिला. हा नाही म्हणायला त्याला ही Green Tea , Lemon Tea सारख्या सवती आल्याच की. पूर्वीच्या काळी म्हणे ब्रिटीश खलाशांनी समुद्रात चहाच्या पेट्या टाकून उठाव केला होता ती घटना Boston Tea Party म्हणून ओळखली गेली. तेव्हापासून चहा ची ओळख जगाला झाली. बघता बघता चहा लोकप्रिय झाला. तरुणांपासून आबालवृद्धांना चहाने भुरळ घातली. बरीच काम करतो हा चहा...कधी प्रियकर प्रेयसी च्या भांडणाचा शेवट , कधी गोड मैत्रीची सुरुवात तर कधी जुन्या नात्यांना नवसंजीवनी देणं. चहाचं काम फक्त नाती जोडणं एवढच आता उरलेलं नाही तर सरकारी कचेऱ्यांमध्येही हा लोकप्रिय झालाय. म्हणूनच की काय बरेच कर्मचारी “आमच्या चहापाण्याचं काय ...? ” असा प्रश्न विचारतात. गल्ली ते दिल्ली आपल्यात सामावून घेणारा हा चहा सगळीकडे फक्त दहा रुपये खर्चून मिळतो याचं मात्र कौतुक वाटतं. आम्हा नाट्यकलाकारांना तर चहा म्हणजे जीव की प्राण. नवीन नाटकांचे प्रयोग , त्यांच्या संहिता आणि बाकीच्या चर्चा चहा घेतानाच तर होतात. पुण्यात अमृततुल्य मानला गेलेला चहा काहींना मात्र रुचत आणि पचत नाही. चहात असलेलं Caffeine म्हणे व्यसनाची सवय लावतं. पण मला प्रामाणिकपणे वाटतं की कुठल्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच मग तो चहा असो किंवा आणखीन काही. बघा बोलता बोलता दुसरा ग्लास सुद्धा रिकामा झाला पण नाटकाच्या तालमीची मुलं काही अजून आली नाही. मी म्हटलो ना आपल्या एकांतात आपली सोबत करणारा चहाच असतो. नाहीतर गेला अर्धा तास वाट बघायला माझ्यासोबत स्वर्गातली अप्सरा थोडीच येणार होती. बरं आली तर चांगलच आहे पण ती येईपर्यंत रामाला अजून एक कटींग आणायला सांगितलं पाहिजे असो आज आज जागतिक चहा दिवस असल्याचे msgs फिरत आहेत...अर्रे हो तुम्हाला सुद्धा जागतिक चहा दिनाच्या भरपूर भरपूर शुभेच्छा बरं का...
-लेखक रुपेश वाणी
यंदा भाद्रपदातल्या तृतीयेला अवकाशातून दोन तेजोतारका पृथीवरती अवतरल्या. त्यातली एक तेजोमय तारका होती श्रीगणेशाची तर दुसरी प्रकाशमान असणारी होती लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांची. यंदा मुद्दामच बाप्पा लोकमान्यांना त्यांनी सुरु केलेला सार्वजनिक गणेशोत्सव बघायला घेऊन आले होते. पुण्यातल्या केसरी वाड्यावर रात्रीचा मुक्काम करून भल्या पहाटे बाप्पा पार्थिव मूर्तींमध्ये तर टिळक जनसामान्यात मिसळले. चतुर्थिपासूनचे तीन दिवस यथासांग पार पडले आणि चवथ्या दिवशी मात्र टिळकांना गणेशाने आपल्याला भूलोकी का आणलं या कोड्याचं उत्तर मिळालं. टिळकांनी घालून दिलेल्या आदर्शाप्रमाणे पहिले तीन दिवस अनेकांकडे अथर्वशीर्ष पठण आणि आरत्या झाल्या. चवथ्या दिवसापासून मात्र मुन्नी बदनाम आणि शीला ची जवानी ने आसमंत दणाणून गेला. कुणाला आमदार झाल्यासारखं वाटलं. तर कुठे शांताबाई येऊन गेल्या. हा सर्व प्रकार याची देही याची डोळा पाहणाऱ्या टिळकांना अखेर गणेशाची व्यथा समजली आणि आपण सुरु केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाची हि अशी वाटचाल सहन न होऊन त्यांनी भूलोकावरून काढता पाय घेतला. असो...यातला विनोदाचा भाग सोडला तर आजचा गणेशोत्सव खऱ्या अर्थाने टिळकांनी घालून दिलेल्या परंपरेप्रमाणे साजरा होतोय का याचा विचार होणं फार गरजेचं आहे. जगाच्या पाठीवर एकमेव मराठी माणूसच उत्सवप्रिय आहे...अशी खुद्द मराठी माणसाचीच धारणा आहे...अगदी सनातन काळापासून घराच्या कोनाड्यात साजरा होणारा गणेशोत्सव टिळकांनी चव्हाट्यावर आणला तो केवळ मराठी माणसांसाठी नाही तर अखिल हिंदुप्रजाजनांत एकसंघतेचं स्फुल्लिंग फुंकण्यासाठी. अर्थातच त्यावेळची परिस्थिती यासर्वाला कारणीभूत असणार हे नक्की. पण आज गणेशोत्सवाची संकल्पना पार बदलून गेलीय. ऐंशीच्या दशकात गिरणी कामगारांनी एकत्र याव आणि संघटीत व्हावं म्हणून लालबाग , दादर , चिंचपोकळी इत्यादी ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक गणेशोत्सव सुरु झाला. सुरुवातीला केवळ मराठी माणसाचा असणारा हा उत्सव नंतर मात्र इतर समुदायांनी मोठ्या भक्तिभावाने स्वीकारला. नवसांचे राजे तयार होऊ लागले आणि आपला गणपती उत्कृष्ट कसा होईल हि इर्षा प्रत्येकाच्या मनात घर करू लागली. मग सिनेसृष्टीतल्या नट-नट्यांना बोलाव, पडद्यावरील चित्रपटांच आयोजन कर हे प्रकार सुरु होऊन सार्वजनिक गणेशोत्सवाने एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर पाउल ठेवलं. २००१ ते २०१२ चा टप्पा गणेशोत्सवासाठी फार उपयुक्त ठरला. यादरम्यान अनेक सिनेमांमध्ये बाप्पा झळकले आणि त्यांच्यावर गाणी लिहिली गेली. श्रींचं पार्थिव रुप आणखीन १७-१८ फुटांनी विस्तारलं आणि आजवर श्रद्धा आणि भक्तीने श्रींसमोर नतमस्तक होणारे भक्तगण मान वर करून मंगलमुर्तींच लोभस रूप डोळ्यात साठवू लागले. सामाजिक संदेश देणारे देखावे पहायला जनसागर गर्दी करू लागला. आणि देखाव्यांच समाजप्रबोधन कमी कि काय म्हणून ठिकठिकाणी रक्तदान शिबीरं , नेत्रतपासणी शिबीर आणि आणखीन बऱ्याच गोष्टींची आयोजनं करण्यात येऊ लागली. अशाप्रकारे लोकमान्यांच्या संकल्पनेशी सुसंगती साधत आमचा गणेशोत्सव मानाचा गणेशोत्सव ठरला . ज्या पुण्यातून या सर्वाची सुरुवात झाली त्या पुण्याने गणेशोत्सवाचं पावित्र्य खऱ्या अर्थाने जपलं. पण २०१५ उजाडल आणि गणेशोत्सवाच स्वरूप पालटायला सुरुवात झाली. स्वतंत्र गल्लीचे स्वतंत्र राजे निर्माण होऊ लागले. नवसाला पावणारे नवीन बाप्पा बाजारात आले.ज्या पुण्यातून गणेशोत्सवाचा पाया रचला गेला त्यां पुण्यात मानाचे गणपती तयार झाले. आणि आजवर केवळ चाळीचा असणारा गणेशोत्सव मित्र मंडळांमध्ये विभागला गेला. पुन्हा एकमेकांच्यात स्पर्धा आणि गणेशोत्सवाचं स्वरूप पालटलं. रचिल्या ऋषीमुनींनी ज्याच्या ऋचा अनंत असं ज्या गणेशाच वर्णन वेदांमध्ये केलंय त्याची स्तुती करणाऱ्या गाण्यांचा तुटवडा भासू लागला आणि शुर्पकर्ण म्हणजेच सुपासारखे भले मोठे कान असणाऱ्या बाप्पाचे कान दुभंगेपर्यंत मंडळांमध्ये फिल्मी गाणी वाजवली जाऊ लागली. थोडक्यात काय तर गणेशोत्सवात ध्वनिप्रदुषणाचा श्रीगणेशा झाला. बाप्पाला निरोप देताना पाणावणारे डोळे अश्रूंनी नाही तर मोटारींच्या धुरामुळे ओले होऊ लागले. आणि अखेर जुन्या पिढीला सध्याचा गणेशोत्सव परका वाटू लागला.विसर्जनाला जमणारी भक्तमंडळी म्हणजे गर्दी वाटू लागली. विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी बाप्पांच्या पार्थिव मूर्तींचे अवशेष समुद्र्किनारचा कचरा वाटू लागला. गणेशोत्सवाच्या पाचव्या दिवशी टिळक स्वतःहून भूलोक सोडून गेले आणि मागे ठेऊन गेले, दहा दिवस हा सर्व प्रकार आपल्या बारीक डोळ्यांनी पाहणाऱ्या आणि हे सर्व सहन करून भक्तांवर आशीर्वादाचा वरदहस्त ठेवणाऱ्याs गणोबाला. म्हणूनच यंदा कैलासावर जातांना बाप्पा भरपूर प्रश्न मागे ठेऊन गेलेत. आपण जर त्या प्रश्नांची उकल करू शकलो तरच मंगलमुर्ती मोरया...पुढच्यावर्षी लवकर या असं म्हणायचा आपल्याला अधिकार आहे.
-लेखक रुपेश वाणी
“आणि तुझ्याबरोबर मलाही...” अपूर्वा च वाक्य संपलं आणि तेरा सेकंदांमध्ये पडदा पडला...नेपथ्याची आवराआवर सुरु असतानाच माझ्या डोळ्यांसमोर आजवर घडलेल्या घटनांची एक निराळी एकांकिका साकार होऊ लागली...साधारण तीन महिन्यांपूर्वी दोन Super Seniors , चार Seniors आणि आम्ही दहा Juniors नी पाहिलेली यंदाचा पुरुषोत्तम करंडक २०१९ IMCC Institute मध्ये मानाने घेऊन येण्याच्या स्वप्नाची एकांकिका...हे स्वप्न म्हणजे कुणा एकाची मक्तेदारी कधीच नव्हती...आम्ही सर्व आपापल्या परीने पुरुषोत्तमरुपी नाट्यदेवतेला मढवत होतो...रंगमचावर असणारे पंचधातू...म्हणजे अपूर्वा घारे , मी ,सायली हिवरेकर ,राजदीप कुंभार आणि अभिजित सावंत तसचं रंगमंचाच्या मागे असणारे नऊ नवरत्न...मयूर काळे , गौरव कुलकर्णी , गौरव धारस्कर ,धनेश्वर टेकाळे ,विराज परघाणे, क्षितीज पांडे, विक्की कापुरे, कौस्तुभ दलाल आणि परिमल शेटे...कारण नुसतेच धातू दागिन्याची शोभा वाढवत नाहीत...तर त्यासाठी धातूच्या कोंदणात असावं लागतं ते अमुल्य रत्न...आणि हे दागिने घडवण्यात महत्वाची भूमिका होती ती दोन कुशल कारागिरांची...अक्षय मोरलवार आणि नरेश बोरसे यांची...तसचं हे दागिने ज्यांच्या मार्गदर्शनाखाली घडवले जात होते त्या दोन व्यक्ती म्हणजे प्राध्यापिका सौ. मीनाक्षी मोरे आणि सुविख्यात दिग्दर्शक श्री. अक्षय दत्त सर... हा प्रवास सुरु झाला १६ मे २०१९ ला...सुरुवातीला पुरुषोत्तमाला आपण काय देऊ शकतो याचा विचार झाला आणि प्रत्येकाने आपापली जबाबदारी स्वत:हून स्वीकारली...मयूर काळे प्रकाशयोजनेत तर गौरव कुलकर्णी ध्वनी व्यवस्थेत दाखल झाले...अखेर संहिता ठरली आणि पात्रनिवड होऊन मे च्या शेवटच्या आठवड्यात सराव सुरु झाला. सुदैवाने महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सभागृह संस्थेने तालमींना उपलब्ध करून दिलं आणि अक्षय दत्त सरांच्या देखरेखीखाली आम्ही जोमाने तयारीला लागलो.अंतिम प्रयोगाला तीन दिवस बाकी असताना नेपथ्यात अमुलाग्र बदल करायचं ठरलं आणि मग खरा कस लागला तो रंगमंचामागच्या कलाकारांचा...ती जबाबदारी त्यांनी उत्कृष्ठपणे हाताळली. २० ऑगस्ट ची सायंकाळ पुढ्यात येऊन ठेपली. भरत नाट्य मंदिराच्या त्या Makeup Room मध्ये आम्हा १३ जणांची Team प्रचंड दडपणाखाली बसली होती. वर रंगमंचावर सादर होणाऱ्या एकांकिकांचे आवाज चेहेऱ्यावरची उत्सुकता वाढवत होते. अखेर आम्हाला वर बोलावण्यात आलं आणि उराशी बाळगलेलं ते ६० मिनिटांच चक्र सुरु झालं. ती ६० मिनिटे बघता बघता सरली आणि आम्ही सज्ज झालो बाहेर उभ्या असलेल्या आमच्या आप्तांचं कौतुक स्विकारण्यासाठी. दुसऱ्या दिवशी पावलं सरळ वर्गाकडे न जाता G1 कडे वळली. जेव्हा सारे पुन्हा भेटलो तेव्हा आतापर्यंत नाटकाला आपण काय देऊ शकतो हा विचार करणारा मी आता मात्र नाटकाने आपल्याला काय दिलं याचा विचार करू लागलो. बरंच काही दिलं नाटकाने. व पु काळे म्हणतात “ माणसाचं आयुष्य मोजावं ते त्याने जोडलेल्या माणसांची आणि त्याने प्राप्त केलेल्या आचार विचारांची मोजदाद करून. ” १३ अनोखी माणसं नाटकाच्या निमित्ताने जोडण्यात मला यश आलं. नियमांच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची तडजोड न करणारा राजदीप , प्रसंगाचं कमालीचं भान असणारा अभिजित , नकारात्मकतेच्या पल्याड असणारी अपूर्वा , वक्तशीरपणा अंगी बाणलेला नरेश आणि हो प्रत्येक गोष्टीकडे वेगळ्या नजरेने बघणारा अक्षय. प्रत्येकजण आपापल्या अनुभवांचं पुस्तक उघडं करून बसलेला. कुणीही यावं आणि हवं ते वाचावं अशी वयाचं भान नसणारी ही माणसं. ही यादी इथचं संपत नाही तर Organized आणि टापटीप असणारी माझी सहकलाकार सायली , दिलेलं काम कुठल्याही परिस्थितीत पूर्ण करणारे आमचे तांत्रिक सहकारी गौरव आणि मयूर यांची ही त्यात भर आहेच. पदोपदी आपल्या अमुल्य टिप्पणीने रंगमंचावरच्या भूमिका समृद्ध करणारी आमचे नेपथ्य सांभाळणारे नऊ कलाकार यांच्या उल्लेखाशिवाय ही यादी अपूर्ण आहे. यातल्या प्रत्येकात स्वतःच असं एक वेगळेपण होतं जे त्यांनी शेवटपर्यंत पुरुषोत्तमाला देऊ केलं. एव्हाना नेपथ्य आवरून आम्ही रंगमंच रिता केला होता. इतक्यात दिग्दर्शक म्हणून सही करण्यासाठी कलोपासकांनी दिलेल्या हाकेने मी भानावर आलो. ४९.५३ मिनिटात आम्ही आमचं नाटक पूर्ण करून सज्ज झालो होतो बाहेर उभ्या असलेल्या आमच्या प्राध्यापक वर्गाचं , मित्र-मैत्रिणींचं आणि आप्तांच कौतुक स्वीकारण्यासाठी. त्यांच्या कौतुकात पुरुषोत्तम २०१९ चा आमचा प्रयोग आटोपला. असो , शेवटाकडे जाताना संकर्षण कऱ्हाडेंच्या ओळींचा उल्लेख करतो आणि थांबतो... “कुछ देर की खामोशी है फिर शोर आयेगा तुम्हारा सिर्फ वक्त आया है हमारा दौर आयेगा”
-लेखक रुपेश वाणी
आमच्या लहानपणी आमच्या आया आम्हाला सावलीपासून लांब ठेवायच्या. इतकंच काय आमच्या स्वतःच्या सावलीकडे बघणं वाईट असत म्हणायच्या.आपलं लहान मन रात्री अपरात्री जागं होऊ नये म्हणून. पण सावली प्रतिबिंब असली तरी तिच्यातली सत्यता आमच्या आया नाकारू शकत नव्हत्या. त्यामुळे आमची डोळेझाक करून आम्हाला सावली या सत्यापासून लांब ठेवलं गेलं.
पुढे आम्ही मोठे झालो. शाळेत वगैरे जायला लागलो. आणि विज्ञानानं एक खूप साधी गोष्ट शिकवली. उघड्या डोळ्यांनी पराकोटीच्या गरम अग्नीसमोर आणि अतिशय थंडगार बर्फासमोर उभं राहता येत नाही. झालं विज्ञानानं देखील आम्हाला आम्हाला सत्याकडे डोळेझाक करायला भाग पाडलं. आणि आम्ही पुन्हा उघड्या डोळ्यांनी सत्य बघायला घाबरू लागलो.
पुढे आम्ही आणखीन मोठे झालो आणि आम्हाला देव शिकवला गेला. थोडक्यात जिथे विज्ञान हात टेकतं तिथून देवाचं राज्य सुरु होतं हा विचार शिकवला गेला. पण आम्ही सत्य आणि मूर्तस्वरूपात असणाऱ्या देवाच्या मूर्ती समोर गेल्यावरदेखील डोळे मिटून घ्यायला लागलो. सत्य आणि मूर्त असणाऱ्या देवासमोर डोळे झाक करायला लागलो.
आणि अखेर आम्ही म्हातारे झालो मृत्यू आम्हाला न्यायला आला. पण आमचं नशीब बघा. जगातलं एकमेव सत्य असणारा मृत्यू आमच्या समोर आला की आम्ही डोळे मिटतो अगदी कायमचे.
सत्याकडे डोळेझाक करायची सवय आम्हाला जी बालपणापासून लावली गेली ती कायमचीच. आणि म्हणून च की काय काश्मिरी पंडितांचं सत्य आमच्यासमोर यायला बत्तीस वर्षं लागली. आगीसारखं प्रखर सत्य देखील उघड्या डोळ्यांनी बघता येतं,फक्त चष्मा घालावा लागतो हा विज्ञानाचा सिद्धांत विवेक अग्निहोत्री या अवलिया माणसानं सिध्द केला आणि द काश्मीर फाइल्स नावाचा ३D चष्मा आमच्या हाती सोपवला. या चित्रपटाचं समीक्षण मी करणार नाही कारण समिक्षणातून आपल्या समोर येईल तो निव्वळ आभास पण सत्याला सामोरं जायचं असेल तर जरूर बघा The Kashmir Files – Right to justice.
पुढे आम्ही मोठे झालो. शाळेत वगैरे जायला लागलो. आणि विज्ञानानं एक खूप साधी गोष्ट शिकवली. उघड्या डोळ्यांनी पराकोटीच्या गरम अग्नीसमोर आणि अतिशय थंडगार बर्फासमोर उभं राहता येत नाही. झालं विज्ञानानं देखील आम्हाला आम्हाला सत्याकडे डोळेझाक करायला भाग पाडलं. आणि आम्ही पुन्हा उघड्या डोळ्यांनी सत्य बघायला घाबरू लागलो.
पुढे आम्ही आणखीन मोठे झालो आणि आम्हाला देव शिकवला गेला. थोडक्यात जिथे विज्ञान हात टेकतं तिथून देवाचं राज्य सुरु होतं हा विचार शिकवला गेला. पण आम्ही सत्य आणि मूर्तस्वरूपात असणाऱ्या देवाच्या मूर्ती समोर गेल्यावरदेखील डोळे मिटून घ्यायला लागलो. सत्य आणि मूर्त असणाऱ्या देवासमोर डोळे झाक करायला लागलो.
आणि अखेर आम्ही म्हातारे झालो मृत्यू आम्हाला न्यायला आला. पण आमचं नशीब बघा. जगातलं एकमेव सत्य असणारा मृत्यू आमच्या समोर आला की आम्ही डोळे मिटतो अगदी कायमचे.
सत्याकडे डोळेझाक करायची सवय आम्हाला जी बालपणापासून लावली गेली ती कायमचीच. आणि म्हणून च की काय काश्मिरी पंडितांचं सत्य आमच्यासमोर यायला बत्तीस वर्षं लागली. आगीसारखं प्रखर सत्य देखील उघड्या डोळ्यांनी बघता येतं,फक्त चष्मा घालावा लागतो हा विज्ञानाचा सिद्धांत विवेक अग्निहोत्री या अवलिया माणसानं सिध्द केला आणि द काश्मीर फाइल्स नावाचा ३D चष्मा आमच्या हाती सोपवला. या चित्रपटाचं समीक्षण मी करणार नाही कारण समिक्षणातून आपल्या समोर येईल तो निव्वळ आभास पण सत्याला सामोरं जायचं असेल तर जरूर बघा The Kashmir Files – Right to justice.
-लेखक रुपेश वाणी
अगदी सुरुवातीपासूनच मराठी नाटक, सिनेमा, पुस्तक किंवा कादंबरी चालते ती फक्त आणि फक्त मांडल्या गेलेल्या कथेवर. मराठी सिनेसृष्टीत अशी कितीतरी उदाहरणे आहेत. पण कधी कधी कथेबरोबरच त्यातील गाणी सुद्धा अजरामर होतात. मग तो कट्यार काळजात घुसली असेल किंवा भाई व्यक्ती कि वल्ली किंवा मग मी वसंतराव.
हा सिनेमा बघावा कि ऐकावा हा असा प्रश्न पडतो म्हणून मी तरी हा सिनेमा दोनदा बघावा असाच म्हणेन. अप्रतिम संगीत आणि सोबतीला वैभव जोशींचे शब्द आणि हे कमी कि काय म्हणून जोडीने वसंतराव आणि पु. लं. देशपांडे या द्वयीचा अजरामर इतिहास या सिनेमाला चार चांद लावतात. भाई व्यक्ती कि वल्ली, आणि डॉ. काशिनाथ घाणेकर आणि आता मी वसंतराव. मराठी साहित्याच्या या शिल्पकारांचं रूप अशा स्वरूपात समोर येत असल्याने मराठी सिनेमा पुन्हा दैदिप्यमान होऊ लागलाय हे निश्चित.
-लेखक रुपेश वाणी
शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ ही म्हण आपण लहानपणापासून ऐकत आलोय. या म्हणीच्या सभोवती अनेक गोष्टी पिंगा घालतात पण ज्या एका प्रसंगामुळे ही म्हण तयार झाली तो प्रसंग म्हणजे अफजल खान वध. शेर शिवराज ही अफजल खान वधाची गोष्ट, त्याहीपेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे अन्यायाशी लढताना न्यायानंच लढावं, परंतु प्रसंगी अन्यायाचा आधार घ्यावा लागला तर तो ही घ्यावा हा शिवविचार जनमानसात पेरणारी गोष्ट.
प्रतापगडाचं युद्ध खर म्हणजे तलवारींनी फार कमी लढलं गेलं. या युद्धात जास्तीत जास्त वापर झाला तो दोन्ही पक्षांच्या धारधार बुद्धीचा. मुघलांच्या औरंग्याला जरब बसवून अटक करणाऱ्या अफजलखान नावाच्या वादळासमोर स्वराज्य म्हणजे केवळ गवताचं पातं होतं. उघड उघड मैदानात लढाई करून महाराजांना जेरबंद करून किंवा जीवे मारून भोसल्यांचा निर्वंश करावा हा छद्मी मनसुबा उराशी बाळगून खान आला होता. या वादळाचा सामना ज्या पद्धतीने महाराजांनी केला त्याला तोड नाही. खानाच्या खाण्यापिण्याच्या सवयींपासून ते अगदी खानाच्या फौजेसोबत असणारं घोडदळ, पायदळ, तोफखाना आणि विलायती बंदुका यांचा सखोल अभ्यास करून इत्यंभूत माहिती महाराजांपर्यंत पोचवणाऱ्या बहिर्जी नाईक आणि इतर गुप्तहेरांची कामगिरी निश्चितच वाखाणण्याजोगी आहे. अफजल खान वध हा प्रसंग कायमच मला दैवनिष्ठ न वाटता विज्ञाननिष्ठ वाटत आलाय. आई भवानीने महाराजांना भवानी तलवार दिली का हा प्रश्न सिनेमात प्रारंभीच निकालात निघाल्याने माझं नास्तिक मन समाधान पावलं. पण तरी एक गोष्ट मला इथे नमूद करावीशी वाटते ती म्हणजे भले ही आमच्या पिढी ने देव मानला नाही तरी चालेल पण धर्म मानलाच पाहिजे. या पुढे देखील आपल्या धर्माबद्दल कुणी विषाद पसरवत असेल किंवा धर्मावरच घाला घालत असेल तर मात्र आपण एकत्र एकजुटीने त्याचं पारिपत्य करायला हवं हा शिवविचार सांगणारा शेर शिवराज सिनेमा आहे. कलाकारांचा अभिनय या प्रसंगाला आणि सिनेमाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जातो. तुकोबांच्या अभंगांचा यथायोग्य वापर, सुरेख चाल आणि श्रवणीय वाद्यमेळ या देखील सिनेमाच्या जमेच्या बाजू आहेत. अफजलखान वधाच्या संदर्भात आणखीन माहिती हवी असल्यास प्रतापगडाचे मंत्रयुद्ध ही राहुल सोलापूरकरांची व्याख्यानमाला देखील आवर्जून ऐकावी.
-लेखक रुपेश वाणी
काही काही वेळा वास्तव इतकं प्रखर असतं की ते प्रत्यक्ष समोर असताना देखील खोटं वाटतं. काश्मीर फाईल्स नंतरचा सत्याच्या जवळ घेऊन जाऊन त्याच्या झळांनी अंग अंग पोळून काढणारा सिनेमा म्हणजे – धर्मवीर ( मुक्काम पोस्ट ठाणे ).
कधी काळी असा राजकारणी आपल्या महाराष्ट्रात होऊन जातो हे सत्य काही केल्या पचत नाही. सध्या महाराष्ट्रात सुरु असलेला हिंदुत्वाचा बाजार हा कधी देवावर येऊन ठेपला हे त्या नेत्यांनाच ठावं. पण खऱ्या अर्थाने हिंदू धर्मवीर म्हणावा असा नेता म्हणजे आनंद दिघे साहेब. आपल्याकडे धार्मिक या शब्दाचा अर्थ देवापापाशी असलेल्या आपल्या भावनेशी जोडला जातो आणि धर्म बाजूला राहतो. यतो धर्मस्ततो जयः असं आपण म्हणतो पण देव मध्ये आणतो आणि धर्माचा पराभव करतो. माणुसकी हाच आपला धर्म मानणाऱ्या आनंद दिघे या धार्मिक नेत्याची कहाणी खरोखर वास्तववादी आणि प्रेरणादायी आहे. प्रसाद ओक या चौफेर फटकेबाजी करणाऱ्या नटाने साहेबांची भूमिका तंतोतंत उतरवून आजच्या पिढीला त्यांच दर्शन घडवलं आहे. प्रवीण तरडेंच लिखाण आणि दिग्दर्शन लाभल्याने हा सिनेमा आणखीनचं प्रभावी ठरला. या सगळ्याच्या पल्याड जाऊन शिवसेनाप्रमुखांच्या भोवतालचं वलय आणि त्या वलयात वावरणाऱ्या एका सच्चा शिवसैनिकाची ही गोष्ट आहे. हा सिनेमा राजकारणाविषयी गढूळ मत असलेल्या माझ्यासारख्या अनेकांनी जरूर बघावा.
-लेखक
आजचा भाग जरा विशेष आहे बरं का! कारण जाऊ तिथं खाऊ च्या या भागात मी तुम्हाला सांगणार आहे कहाणी StarSucks..माफ करा Starbucks या प्रसिद्ध कॉफी हाऊस ची. नित्यनेमानं पुण्यनगरीत आल्या आल्या भाडाईत मिसळ मध्ये उदर भरण (जेवण) करुन मी आणि माझा मित्र पुण्यनगरीच्या F.C. मार्गावरुन निसर्गदर्शनाचा लाभ घेत निघालो होतो.
अशातच एक सुंदर ललना तिच्या वाहनावर स्वार होऊन पवनवेगानं आमच्या पुढं निघाली. Men's Day असल्यानं आमचा पुरुषी अहंकार जागृत होऊन आम्ही तिच्या पुढं जाण्यासाठी आमच्या वाहनाचे कान पिळले. तिच्या जवळ जाता जाता आमच्या लक्षात आलं की तिच्या वाहनाचं Stand खालीच आहे आणि कुठल्याही क्षणी ती FC Road वर "घालीन लोटांगण...वंदीन चरणं" अशा अवस्थेत आडवी तिडवी पडू शकते. तिला पडू नं देणं हे आपलं आद्यकर्तव्य समजून आम्ही तिचा पाठलाग करत तिच्या मागोमाग गेलो. Finally ती Starbucks समोर थांबली आणि तिथं तिचा तो तिची वाट बघत उभा होता. त्याच्याकडं बघुन खरं म्हणजे आमच्या तळपायाची आग मस्तकात गेली होती पण तिचा शीतपणा आम्हाला त्यांच्या पाठोपाठ आत घेऊन गेला.
आत पाऊल टाकल्यानंतर तर सगळंच बदललं, सगळीकडे नुसता कॉफीचा दरवळ भरुन राहिला होता. तिच्यापेक्षा शतपटीनं सुंदर ललना तिथं उपस्थित होत्या. त्यातल्याच एकीनं पुढं येऊन आम्हाला इंग्रजी भाषेत Welcome केलं आणि आमच्या उत्तराची वाट न बघता क्षणात दिसेनाशी झाली. आम्ही काउंटर वर जाऊन उभे ठाकलो आणि काय घ्यावं हा विचार करु लागलो. अर्थातच १००-२०० च्या घरात काहीही मिळणार नाहीये हे जेव्हा कळलं तेव्हा आम्ही मनाची तयारी करुन १० टक्के व्याजानं कर्जासाठी अर्ज केला. आमचं कर्ज मंजूर झालं आणि आम्ही आमची Order देऊन स्थानापन्न झालो. काही वेळानं एका मंजूळ आवाजात माझ्या नावाचा पुकारा झाला. खरं सांगतो माझ्या नावाचा त्याक्षणी मला इतका अभिमान वाटला म्हणून सांगू. माझं नाव ठेवणाऱ्या माझ्या आत्याचे मी मनोमन आभार मानले. तेवढ्या दोन मिनिटात वाटून गेलं की "अरे, लग्नानंतर जर का रोज याच आवाजात हाक येणार असेल तर काय बहार येईल." या विचारात मी भारल्यासारखा आवाजाच्या रोखानं निघालो आणि आवाजाची मालकीण बघून माझ्या आशा मावळल्या. हा व्याप मला काही परवडणारा नव्हता. असो, थंडगार कॉफीचे दोन कप घेऊन मी आमच्या जागेवर आलो. त्या कॉफीचा एक एक घोट मला आता अमृतासमान वाटत होता. विरघळून चंद्र आज रक्तातून वाहे म्हणजे नक्की काय हे मला प्रत्येक घोटाबरोबर कळत होतं. सुखाचा कुठलाच क्षण अमर होत नाही तसा हा वेळ पण भराभर निघून गेला. या सगळ्या स्वप्नविलासातुन बाहेर येत माझी नजर बिलावर गेली आणि मी नखशिखांत हादरलो.
हजाराला १०० रुपये कमी असा ९०० चा आकडा तिथं झळकत होता. मघाशी Order दिल्यानंतर Cashier ला झोकात कार्ड देताना या आकड्याकडे नजरच गेली नव्हती. त्याचा विचार आता करुन उपयोग नव्हता. बाण धनुष्यातून निघाला होता आणि आमच्या **********. मोठ्या कष्टानं आम्ही कपाच्या तळाशी राहिलेला बर्फ चघळत संपवला आणि कप घरी घेऊन शोकेस कपाटात ठेवायचा म्हणून उचलायला लागलो.
एवढ्यात त्या सुंदरींपैकी एक आमच्या दिशेनं ते रिकामे कप न्यायला म्हणून आली. जाता जाता "कॉफी कशी होती...?" असा नेहमीचा प्रश्न विचारुन आशाळभूत पणे उभी ठाकली. तिचा तो अर्थपूर्ण कटाक्ष बघून माझा हात आपसूकच खिशाकडं गेला आणि ९०० चे १००० पुर्ण करण्याच्या हेतुनं मी शंंभराची नोट बाहेर काढली. ती माझ्याकडची शेवटची नोट आहे हे तिला बहुधा कळलं असावं. पण मला मात्र याचं भान नव्हतं. मी केव्हाच बोहल्यावर चढून तिच्यासोबत सप्तपदी घेण्यास सिद्ध झालो होतो. पण तिनं नम्रपणे नकार दिला. तो नकार माझ्या हातातल्या लक्ष्मीला तर होताच पण माझ्या घरची लक्ष्मी होशील का? या प्रस्तावाला देखील होता. दुर्दैवाने ही गोष्ट पेपर नॅपकीननं तोंड नं पुसता खिशात ठेऊ बघणाऱ्या माझ्या दोस्ताला कळली आणि खिन्न मनानं आम्ही StarSucks च्या...माफ करा StarBucks च्या बाहेर पडलो.
-लेखक IDEa5.0
दिल्ली गाठली आणि थोड्याच वेळात पावलं चांदनी चौकाच्या दिशेने चालू लागली. बरंच काय काय ऐकून होतो इथल्या स्ट्रीट फूड बद्दल. तिथं जाऊन नक्की काय खावं हे मित्रांनी सांगितलं होतंच पण तरी पाटी कोरी ठेवली आणि पहिला स्टॉल गाठला.
स्टॉल कसला छोटेखानी दुकानच ते. निरनिराळे पदार्थ ओळीनं मांडून ठेवलेले दिसत होते. शेजारीच पेटलेल्या भट्टीत गरम गरम नान आणि रोट्या भाजल्या जात होत्या. दाल मखनी आणि बटर नान अशी Order देऊन मी त्या स्वयंपाक्याच्या Process वर लक्ष केंद्रीत करायला लागलो. एव्हाना गरमागरम दाळ वाट्यांमध्ये पडत होती आणि दोन्ही बाजूंनी आपलं शरीरसौष्ठव आजमावत गरम नान भट्टीत जाऊन फुगायला तयार होतं.
अपेक्षित वेळेपेक्षा कमीत कमी वेळेत ताट तयार करुन तो कारागिर आपल्या कलाकृतीवर शेवटचा हात फिरवण्यात मग्न होता. शेवटचा हात म्हणजे काय तर तीन-चार मुठी तिखट आणि एक मुठ जिरं अश्या लालेलाल रंगपंचमी ची फोडणी देऊन ते तिखटामृत प्रत्येक वाटीत ओंजळ ओंजळ ओतत होता. एव्हाना मी पश्चातापाच्या पल्याड जाऊन आहे त्या परिस्थितीला सामोरं जायची तयारी करुन बसलो होतो.
माझ्यासमोर ताट आलं. त्या कलाकारानं स्वहस्ते मला पाण्याची बाटली आणून दिली. पुढे ओढवणाऱ्या संकटाची ती चाहूल होती. मी पहिला घास घेतला आणि त्या चौकाचं चांदणी चौक हे नाव किती समर्पक आहे याची कल्पना आली. भरदिवसा दरदरून घाम फुटलेल्या अवस्थेत ते ताट मी रितं केलं आणि गोड काहीतरी खाण्याच्या हेतूनं पुढं वाटचाल सुरू केली.
-लेखक IDEa5.0
नव्या वर्षात आता १० किलो वजन कमी करावं म्हणून मी रोज पळायला जायचा संकल्प सोडला. रोज पहाटे ८:०० वाजता उठायचं, चालायला जायचं आणि मग घरी येऊन पुन्हा पलंगावर पडायचं असा नियम बनवून मी निवांत झालो होतो. आता दोन महिन्यात शारीरिक वजन कमी होऊन हँडसम हंक व्हायचं आणि मग मुलींच्या हृदयात आपलं वजन वाढवायचं इतकं सोपं गणित होतं.
पहिल्या दिवशी मला जाग आली पहाटे ७:०० वाजता. याठिकाणी रसिक वाचकांना मला एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते ती म्हणजे पहाटे लवकर उठायचंय म्हणून आधी लवकर झोपणं गरजेचं असतं. ज्याक्षणी तुम्ही रात्री लवकर झोपता तेव्हाच तुम्ही २५ टक्के लढाई जिंकलेला असता. त्यानंतर दुसरा टप्पा. पहाटे जाग आल्यानंतरची पुढची १५ मिनिटं फार महत्वाची असतात. या पंधरा मिनिटात पुढच्या ७५ टक्के लढाईचं गणित ठरणार असतं. होत काय की आपल्याला जाग येते पण काही क्षणातच गुरुत्वाकर्षणाच्या नियमाचा आधार घेत आपलं शरीर पुन्हा अंथरुणावर पडतं आणि आणखीन १० मिनिटं झोपू म्हणून झोपलेलो आपण थेट १० वाजता उठतो. त्यामुळे या १५ मिनिटात आपलं भविष्य, सुटलेलं पोट, लग्न, इत्यादी गंभीर विषयांचा विचार करावा. आणि अंथरुणाला राम राम करावा.
झालं, पहिल्या दिवशी जाग आल्यावर मी सुद्धा याच विचारांचं मंथन केल्याने माझा पुढचा कार्यक्रम सुफळ संपूर्ण झाला. सगळं उरकून घरून निघायला ८ वाजले. बाहेर छान वातावरण होतं. पहिला दिवस असल्यानं अंगात उत्साह होता. जेमतेम निम्मं अंतर पार केलं आणि ज्या प्रश्नाची मी स्वप्नात देखील कल्पना केली नव्हती तो प्रश्न दत्त म्हणून समोर उभा ठाकला. आमच्या प्रभातफेरीच्या रस्त्यावर “महाजन पोहेवाले” हे जगात भारी तर्री पोह्यांचं दुकान आहे. मागे Driving Class ला पहाटे जाताना आधी पोटोबा आणि मग सुटोबा असं तंत्र वापरून मी दणकून दोन प्लेट खायचो आणि मग पुढे जायचो. हा पराक्रम महिना दोन महिने चालल्याने आमची छान ओळख झाली होती. बऱ्याचदा पुढच्या तीन दिवसांचे पैसे मी आधीच द्यायचो. आता मात्र असं चटकदार खाणं बंद करावं लागणार होतं. महाजनांची नजर चुकवून मी पुढे पुढे जात असतानाच त्यांची माझ्याकडे नजर गेली आणि त्यांनी मला हाक दिली. चालून चालून दमलो होतोच म्हणून फक्त थोडा वेळ थांबून गप्पा मारायच्या उद्देशाने त्यांच्या गाड्याजवळ जाऊन उभा राहिलो.
आत्ताच दुकान उघडलेलं असल्यानं त्यांची लगबग सुरु होती. कांद्यांची आणि लिंबाची सरसर सरसर कत्तल होत होती. एकीकडे आत्ताच न्हाऊन झालेल्या पोह्यांना हळद लावली जात होती. कढईत तेल, जिरं आणि मोहरी मंगल गीतं वाजवत होते तर दुसरीकडे महाजनांची अन्नपूर्णा तर्री रस्सा करण्यात मशगूल झाली होती. घरून आणलेला मसाला आधी कढईत तळला जात होता. मग त्यात पाणी घातलं गेलं. मग मटकी आणि वाटाणे नवरदेवाची मामा अन नवरीचे मामा या मंगल कार्यात सहभागी झाले आणि जिकडे तिकडे नुसता दरवळ सुटला. एव्हाना मी इकडतिकडच्या गप्पा मारून निघायची तयारी करत होतो. पण कढईत असलेले पोहे लालबुंद होऊन माझ्याकडे बघत होते. मी त्यांची नजर टाळत त्यांना I Love You, But As A Friend असा घरचा आहेर देऊन निघणार एवढ्यात त्या अन्नपूर्णेने वाफाळत्या रश्श्याने भारलेली एक प्लेट समोर केली. मी नकार देऊ शकलो नाही. काही वेळाने दोनाचे चार होतील कि काय अशी भीती वाटून मी 50 रुपयांचा online आहेर केला आणि पुढे निघालो. आज मूठभर मांस जास्त वाढलं होतं यात शंका नव्हती. हे वाढलेलं वजन घालवायला फार कष्ट पडणार होते.
दुसऱ्या दिवशी मात्र मी रस्ता बदलला आणि जरा निराळ्या रस्त्यानं फिरायला निघालो. आज माझ्या दृढसंकल्पात कुणीही येणार नव्हतं. कारण मी आज रस्ता बदलून फिरायला निघालो होतो. आज माझ्या रस्त्यात महाजन नव्हते कि त्यांची अन्नपूर्णा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज मी माझा फोन सुद्धा सोबत आणला नव्हता. त्यामुळे कुठे काय खर्च करायचा प्रश्न च नव्हता. उद्यानात गेलो. तिथलं दोन्ही प्रकारचं निसर्ग सौंदर्य न्याहाळून आणि पायांचे तुकडे पडतील इतकं पळून झाल्यावर घरी यायला निघालो. एव्हाना छान उजाडून लक्ख प्रकाश पडला होता. चालून चालून आणि पळून पळून पाय नको म्हणत होते. दुसऱ्याच दिवशी उद्यानाला ५०० मीटर चा एक असे ६ राऊंड मारून आम्ही नवा विक्रम प्रस्थापित केला होता. बस्स आता काही वेळ आणि आपलं घर समोर. अचानक मागून मला दिलेल्या हाकेनं या सगळ्या विचारांच्या गर्दीतून बाहेर येऊन मी मागे बघितलं तर चिरायू(नाव बदललेलं) मागून आवाज देत होता. आजवर ज्या ज्या शहरात माझं वास्तव्य झालंय तिथे मी अनेक माणसं जोडलीत पण प्रत्येक शहरात एक तरी असा खव्वय्या मित्र मी जरूर जोडतो. त्यातलाच हा एक. त्याची हिरो होंडा माझ्याजवळ येऊन थांबली. काय शेठ कुठं ? असा रवंथ करून करून चोथा झालेला प्रश्न आम्हा दोघांच्या तोंडून निघाला. पुढच्या संवादात बऱ्याच शिव्यांचा वापर झाल्यानं मी ते सांगत नाही. पण शेवटाला मी त्याच्या गाडीवर बसलेलो होतो. आमची स्वारी निघाली होती मुख्य पेठेत. अनेक गुज्जू घोळका करून एके ठिकाणी उभे ठाकले होते. नवरात्रीला अजून अवकाश होता मग हे काय म्हणून मी कुतूहलाने तिथं गेलो. आणि बघतो तर काय प्रत्येकाच्या हातात ढोकळा आणि कचोरीची प्लेट. एवढा वेळ आरडा ओरडा करणारे पाय आपोआप त्या ठेल्याकडे चालते झाले. त्या ठेल्याच्या आसपासचा परिसर एका निराळ्याच वासाने भारला गेला होता. आपल्या कळकट हातांनी तो गुजराती ब्रम्हदेव कणकेला आकार देऊन कचोरीच्या आवरणाची निर्मिती करत होता. तिकडे एका बाजूला एक ऋषितुल्य व्यक्ती कढई रुपी होम पेटवून सिद्ध झाला होता. पण आधी निरनिराळ्या प्रकारच्या मसाल्यांनी त्याने कचोरी रुपी पृथ्वी भरून टाकली. आणि त्या पेटलेल्या यज्ञात अर्पण केली. ती पृथ्वी तेलसागरात गटांगळ्या खाऊन लालसर होते आहे असं कळताच एक अवतारी पुरुष धावला आणि तिला आपल्या झाऱ्याने वर घेऊन आला. इकडे कुकर मधून गरम गरम ढोकळे काढून त्यांच्या जमिनीची मोजणी करण्यात एक जण मशगूल झाला होता. लागलीच आणखीन एका गरम तेलसागरात जिरं, मोहरी आणि मिरच्यांनी आपणहून उड्या घेतल्या. काहीवेळ पोहून झाल्यावर तो संपूर्ण तेलसागर ढोकळ्यांच्या पृष्ठभागावर रिकामा केला गेला. या रमणीय दृश्याला नजर लागली ती एका गुज्जू नं दिलेल्या ढुशीने. एव्हाना आमच्या मित्राने ऑर्डर देऊन मला पुढे केलं होतं. ढोकळ्याची आणि कचोरीची युती होऊन ते एकजीव झाले होते. गुजरात आणि उत्तर प्रदेश यांचा सुरेख मिलाफ खरोखर दैवी होता. कांदा आणि बारीक शेव सजवून हे आघाडी सरकार दोन प्लेट मध्ये बसलं. पहिला घास घेतला आणि मी भारताच्या या दोन टोकांची भ्रमंती करून पुन्हा महाराष्ट्रात येऊन स्थिरावलो. एकाचे दोन आणि दोनाचे तीन होऊन मी पैसे द्यायला म्हणून मोबाईल बाहेर काढण्यासाठी खिशात हात घातला. पण मोबाईल जागेवर नव्हता. पण एक नोट हाताला लागली. ती शंभराची नोट पुढे सरकवून मी आनंदात हात धुवायला लागलो. या स्वर्गसुखाच्या प्रभावाखाली असतानाच आमच्या घरच्या गाडीच्या आवाजाने मी दचकलो आणि मागे वळलो. तर आमचे तीर्थरूप दुधाच्या पिशव्या घेण्यासाठी सकाळची झोप झटकून साक्षात प्रकट झाले होते. आमची वाट बघून बघून आमच्या घर कुल स्वामिनीने म्हणजेच आमच्या आईने त्यांना सत्वर दूध आणण्याच्या अवघड कामावर पाठवले होते. तेव्हा कुठे मला उलगडा झाला मघाशी हाती लागलेली शंभराची नोट ही त्याक्षणाला जरी वरदान असली तरी आता तो मला लाभलेला शाप होता. घरच्या पैशांनी बाहेरचं खाणं आणि ते ही मी डाएट वर आहे असा गाजावाजा केलेला असताना. छे छे हे अतीच झालं होतं. या पापाचं क्षालन करण्यासाठी उद्यापासून दोन राउंड जास्त मारायचे हा विचार करत मी परतीच्या मार्गाला लागलो.
-लेखक IDEa5.0
तसा मी रोजच काम करतो पण काल जरा जास्तच झालं. जास्त काम केल्यानं जास्त स्ट्रेस आला. जास्त स्ट्रेस आल्यानं जास्त डिप्रेशन मध्ये गेलो. जास्तीचं काम आता जास्त वेळ नाही करायचं म्हणून जरा जास्त वेळ सुरु असलेला लॅपटॉप बंद केला आणि घराबाहेर निघालो. पाऊस तसा जास्त नव्हता पण जिथे जायचंय ते अंतर जास्त होतं म्हणून गाडी काढली. अंतर जास्त असल्यानं घरातुन जरा जास्त पेट्रोल टाकून घे असा सल्ला ऐकून निघालो. खिशात तसे जास्त पैसे नव्हते, अगदीच मोजके होते. पण पेट्रोल भरणाऱ्याकडे सुटे नसल्यानं त्यानं आणखिन जास्तीचं पेट्रोल भरलं आणि जास्त पैसे उकळून राऊंड फिगर अमाउंट केली.
आज जरा जास्तच खर्च झाला होता पण स्ट्रेस पण जास्त होता म्हणून सरळ एका मानसोपचारतज्ज्ञाकडे गेलो. त्याला माझा जास्तीचा प्रॉब्लेम सांगितला. त्यानं खुप जास्त प्रश्न विचारले. आणि कमीजास्त प्रमाणात मान हलवून मी त्याला उत्तरं दिली. तसं त्यानं आणखिन जास्त वेळ न घेता मला गोळ्या लिहून दिल्या. आणि फी जमा करायला सांगितली. फी मात्र जरा जास्तच होती. पण आपल्या मेंटल हेल्थ पेक्षा जास्त काही नाही म्हणून जास्त असलेली फी मी दिली. आणि जास्त विचार न करता औषधं घेऊन घरी निघालो.
वाटेत नेहमीचा पाणीपुरीवाला थांबला होता. तशी आमची काही जास्त ओळख नाही पण तरी त्याला जास्त वाईट वाटेल म्हणून गाडी थांबवली आणि त्याला एक प्लेट बनवायला सांगितली. भूक तशी जास्त नव्हतीच पण जेवणानंतर घ्यायला लागणाऱ्या गोळ्यांचा जास्त परिणाम होऊ नये म्हणून हे जास्तीचं खाणं खावं लागलं.
खाऊन झाल्यावर पटकन गोळी घेतली आणि घड्याळाकडे नजर टाकली अरे बापरे,आज जरा जास्तच उशीर झाला होता. फोन बघितला तर आईचे रोजच्यापेक्षा जास्त फोन येऊन गेले होते. गाडीचा वेग आणखिन जास्त वाढवला. आणि सुसाट वेगानं घरी निघालो. आज रस्त्यात जरा जास्तच खड्डे लागत होते. घर तसं जास्त लांब राहिलं नव्हतं पण म्हणून स्पीड कमीजास्त करत होतो. अचानक समोर डाव्या बाजूचं इंडिकेटर देऊन उजव्या बाजूला टर्न घेताना तिला पाहिलं.
हो तीच ती.
याच कारणावरून तर आमचं रोज भांडण व्हायचं. पण त्या दिवशी जरा जास्तच झालं होतं. एरवीपेक्षा ती खुप जास्त बोलली होती. माझा ही आवाज जरा जास्तच वाढला होता. म्हणून आम्ही दोघांनी ते भांडण जास्त न ताणता तिथेच थांबवलं होतं. पण आज तिला पुन्हा तसंच करताना पाहिलं आणि मी तिच्यापर्यंत पोहोचावं म्हणून गाडीचा स्पीड जरा जास्त केला आणि तिच्यापर्यंत पोचलो तिला समजावलं पण तिचा राग कमी होण्याच्या ऐवजी जास्तच वाढला. माझ्याकडून काही कमीजास्त बोललं जाऊ नये म्हणून मी यू टर्न घेतला पण स्पीड जास्त असल्यानं गाडी जरा जास्त खोल असलेल्या खड्ड्यावरून घसरली आणि मी दाणकन् खाली आदळलो. तसं जास्त काही लागलं नाही पण खुप जास्त अंतर फरफटत गेल्यानं खुप जास्त खरचटलं होतं.
डॉक्टरांनी दिलेल्या गोळीचा काही परिणाम होतोय का असं वाटत असतानाच अचानक हाताला जोरदार झटका बसला आणि खुप जास्त प्रमाणात तीव्र झिणझिण्या अंगभर पसरल्या. माझा हात खुप जास्तवेळ डोक्याखाली असल्यानं त्याला होणारा जास्तीचा रक्तपुरवठा मंदावला होता. आणि लॅपटॉप वर मेसेज झळकत होता "हाय रुपेश, वी हॅव अ कॉल विथ क्लाईंट ऍट शार्प ९:०० पी. एम.". पुन्हा घड्याळाकडे नजर टाकली आठ वाजलेले होते. सुन्न झालो. नक्की काय जास्त झालं होतं. बाहेर पडणारा पाऊस? की रात्रीचं बाहेर भटकणं...? की तिच्यासोबतचं भांडण...? की डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या. छे छे पुन्हा पुन्हा या प्रश्नांनी डोकं भंडावून सोडलं आणि मग उत्तर मिळालं. कोपऱ्यात पडलेली व्हिस्की ची बॉटल आज जरा जास्तच रिकामी झाली होती आणि हलकी झाल्यामुळे जरा जास्तच लांब गेली होती.
-लेखक IDEa5.0
एका राजकीय पक्षानं विशिष्ट ध्येयानं सुरू केलेली ही सावरकर गौरव यात्रा माझ्यासाठी मात्र मागल्या वर्षीच सुरू झाली होती.
नाशिक हून अगदी काही अंतरावर असलेल्या भगूर येथल्या तात्यारावांच्या जन्मस्थानापासून.
या मातृभूमीला स्वतंत्र करण्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून शत्रूस मारिता मरेतो झुंजेन ही प्रतिज्ञा ज्या अष्टभूजेसमोर बाळ विनायकाने घेतली तिथं मी गेल्या वर्षी उभा होतो. आणि माझ्या लेखी तिथूनच सुरू झाली होती माझ्यापुरती सावरकर गौरव यात्रा. या वर्षभरात जितकी म्हणून तात्यारावांची माहिती मिळेल तितकी गोळा करण्याचा यत्न मी आरंभला. मग ते भगूर ला त्यांच्या वाड्यात घालवलेले क्षण असू देत किंवा रत्नागिरीला स्थानबद्धतेत असताना त्यांनी स्थापिलेल्या पतित पावन मंदीराचं दर्शन असू देत. आपल्या एकूणच आयुष्यात उपयुक्तता वादावर भर देणाऱ्या या अवलियाला मी लेखक आणि नाटककार म्हणून खुप जवळून पाहिलं. त्यांचा हिंदूत्व नावाचा ग्रंथ वाचताना आपण कोण आणि आपला इतिहास काय यासोबतच हिंदूत्वाच्या नेमक्या व्याख्या स्पष्ट झाल्या. सिंधू नदीपासून ते हिंदी महासागरापर्यंतच्या या भूमीला जो कुणी आपली मातृभू पितृभू म्हणून संबोधणार तो माझ्या लेखी हिंदूच. मग त्यात कुठल्याही जातीचा अथवा धर्माचा अडसर येता कामा नये हा तो सरळ आणि स्पष्ट विचार. हल्ली विविध पक्ष ज्या हिंदूत्वाच्या व्याख्या घेऊन फिरतायेत त्याहून कितीतरी वेगळं.
त्यांची मला मिळालेली आणखिन एक अद्भुत भेट म्हणजे स्वास्तिक पणाची शिकवण. स्वास्तिक (स्व - आस्तिक). जगातल्या कुठल्याही देवात माझं वाईट करण्याची शक्ती नाही, माझ्या भल्याबुऱ्याचं अंतिम कारण सदैव मी आणि मीच असणार हे स्वास्तिकत्वाचं मूल्य मी आत्मसात केल्यानं आयुष्याच्या कुठल्याही संकटात देवाचा धावा करण्याऐवजी मी सारासार विचार करून निर्णय घेऊ शकतो. देव आणि धर्म कसे वेगळे आहेत याचं सुरेख विश्लेषण आणि हिंदू हा धर्म नसून ती अनादी काळापासून चालत आलेली जगण्याची पद्धत आहे हे सावरकरांच्या लिखाणातून माझ्यासमोर आलेले धार्मिक मुद्दे.
परवा परवाकडे कुण्या वृत्तवाहिनीवर असलेल्या एका मुलाखतीत एक वक्ता बोलून गेला की "सावरकर हे बहुतांशी स्थानिक नेते होते. त्यांच्या विचारांची व्याप्ती आणि आधारस्तंभ हा फक्त महाराष्ट्राचा काही भाग होता. तत्कालीन कॉंग्रेस धुरिणांइतकी त्यांची देशाबद्दलची समज नव्हती." हा माझ्यालेखी मुद्दा निकालात निघाला त्यांच्या आणखिन एका कादंबरीमुळे
"मला काय त्याचे (अर्थात मोपल्यांचे बंड)" तत्कालिन खिलाफत चळवळीमुळे एका विशिष्ट समुदायानं दुसऱ्या समुदायावर केलेले अत्याचार आणि तीन चार दिवसांचा तो भीषण नरसंहार या सगळ्याची योग्य कारणमीमांसा करणाऱ्या या कादंबरीचा भूतकाळ आहे तामिळनाडू प्रांतातील मलबार परिसरात. शहाण्यास अधिक सांगणे न लगे.
मी आमच्या जळगावाला ज्या काही गोष्टींमुळे भाग्यशाली समजतो त्यातली एक प्रमुख गोष्ट म्हणजे इथली विचारधारा. राष्ट्रीय नेत्यांचे पुतळे प्रत्येक शहरात असतातच पण सावरकर आणि गांधी या दोन क्रांतिसुर्यांचे पुतळे एका ठिकाणी फक्त जळगावात च आहेत असा माझा कयास आहे. आजच्या काळात तुम्ही गांधीवादी नसाल तर सावरकर वादी आहात असा गैरसमज फोफावत असताना या दोन्ही विचारांची सांगड घालत मार्गक्रमण करणारं माझं शहर आणि इथली विचारधारा मला प्रचंड भावते.
वानगीदाखल काल घडलेला प्रसंग सांगतो.
चौकाचौकातून फिरणारा हा गौरवरथ फिरत फिरत एका इमारतीपाशी येऊन थांबला. त्या इमारतीतुन एका विशिष्ट पक्षाचा कार्यकर्ता आपलं हिंदूत्व घेऊन पण अक्कल घरी ठेवून बाहेर आला आणि या रथाचं स्वागत करावं म्हणून २००० फटाक्यांची माळ फोडून मोकळा झाला. नमस्कार चमत्कार आणि फोटोसेशन सुरु असतानाच कुण्या एकाची नजर सावरकरांच्या तसबिरी वर असलेल्या हारावर गेली आणि त्यानं हार बदलण्यासाठी रथ पुढे हाकारला. एका स्थानिक दर्ग्यासमोर हा रथ येऊन थांबला आणि तिथल्या मुस्लिम विक्रेत्यानं स्वत:च्या हातानं एक हार विणून प्रारंभी प्रतिमेला नमन करुन तो हार तसबिरीभोवती लावला. मी भरून पावलो. अंगावर शहारे आलेल्या अवस्थेत माझ्या कानात उच्चार झाला हिंदूत्वाच्या व्याख्येचा. ती व्याख्या होती
आसिंधू सिंधू पर्यन्ता यस्य भारत भूमिका पितृभूः पुण्यभूश्चैव स वै हिंदुरिती स्मृतः ॥
-लेखक IDEa5.0
“आयुष्यात एकदा तुम्हाला भेटलेली व्यक्ती पुन्हा तुम्हाला पुढे जरूर भेटतेच. आणि नियती तिचं वर्तुळ पूर्ण करते.” मागे कधीतरी, कुठेतरी हा सिद्धांत वाचण्यात आला होता. आजवरच्या २५ वर्षांच्या आयुष्यात आम्ही खूप जणींवर प्रेम केलं. काही जणींनी आमच्यावर प्रेम केलं. काहींना आम्ही मनातलं सांगितलं, काहींनी आम्हाला मनातलं सांगितलं तर काहींनी नं सांगणं पसंत करून आमचा निरोप घेतला. ज्यांचा आम्ही नं सांगता कधी काळी निरोप घेतला होता त्यांच्या पुन्हा आयुष्यात येण्याची सुतराम कल्पना आम्हाला नव्हती. साधारणपणे यत्ता चौथी च्या आसपास चा तो काळ होता. आम्ही नुकतीच चौथी पास करून पाचवीला नवीन शाळेत जाणार होतो. जुन्या शाळेचा निरोप घेण्याची वेळ आली होती. निकाल घेऊन मी सर्व मित्र-मैत्रिणींना भेटलो. ती अजून आलेली नव्हती. शाळेच्या गेटवर पाय रेंगाळत होते. काही मित्रांना, शिक्षकांना पुन्हा पुन्हा भेटून, बोलून मी वेळ मारून नेत होतो. बाहेर वडील गाडी उभी करून आमची वाट बघत होते. आणि आमची गाडी तिच्या येण्याची. तास दोन तास झाले होते. पाय निघत नव्हता. पण आता वाट बघण्यात अर्थ नव्हता. जरुरी कागदपत्र आणि निकाल घेऊन वडील आधीच बाहेर गेले होते. त्यामुळे आता नवीन कारणाने आत जाऊ शकत नव्हतो. नाईलाजाने बाहेर आलो आणि थबकलो. ती रिक्षातून टुणकन उडी मारून बाहेर येत होती. तिचे बाबा रिक्षा लावून मागून येणार होते. मला जेमतेम तीन-चार मिनिटं मिळणार होती. तेवढ्या वेळेचा सदुपयोग करून आपल्या घरी लावलेल्या Landline चा नंबर तिला द्यावा आणि मग नंतर तासनतास तिच्याशी गप्पा माराव्या असे मी मनात मांडे रचत होतो. गेले दोन दिवस पाढा पाठ करावा तसा मी आमचा नंबर पाठ करून ठेवला होता. पण तिच्या घरी फोन नसेल तर?, असला तरी फोन लावल्यावर तीच बोलेल कशावरून? झालं आमचा ढगात गेलेला कॉन्फिडन्स सरसर सरसर खाली जमिनीवर झेपावला आणि विचारांच्या या वावटळीत आम्ही सापडलो असतानाच ती आणि तिचे बाबा मला ओलांडून शाळेत गेले. माझ्या वडिलांनी दिलेल्या हाकेने मी भानावर आलो. वेळ निघून गेली होती. आता हातात काही नव्हतं. मनात असून देखील मी काही करू शकत नव्हतो. सगळं संपलं होतं. एव्हाना वडील तोंडानं हाका नं मारता गाडीचा हॉर्न वाजवत होते.
क्षण दोन क्षण विचार केला आणि तसाच उलट मागे फिरलो. धावत पळत Staff Room कडे आलो. ती तिचा निकाल हातात घेऊन बघत होती. तिचे बाबा आमच्या बाईंशी बोलत होते. सर्व धीर एकटवुन मी तिच्याकडे जात असतानाच तिच्या बाबांनी त्यांच्या बोलण्यात तिला ही सहभागी करून घेतलं आणि आमचा पाय अडकला. काय करावं, काय करावं हा विचार सुरु असतानाच शेजारी कार्यानुभवाच्या वस्तूंचं कपाट हाताला लागलं. आमच्या वर्गानं गेल्या वर्षी बनवलेले Greeting Cards तिथे धूळ खात पडलेले होती. मी पटकन एक ग्रीटिंग कार्ड उचललं आणि त्यावर गेले दोन दिवस तोंडपाठ केलेला आमचा नंबर लिहिला. गुपचूप पाठीमागून जाऊन तिच्या बॅगेत ठेवला. माझं पत्र मी थेट गुलाबी पत्रपेटीत टाकून मोकळा झालो होतो. त्या पत्राला आता कुठल्याही पत्त्याची गरज नव्हती. ते पत्र नियोजित ठिकाणी पोचलं होतं. मी बाहेर आलो. स्वतःवर प्रचंड खुश होतो. इतका की पायऱ्या उतरताना एक एक नं उतरता एकदम दोन-तीन पायऱ्या सोडून उडी घेतली. पडलो नाही पण पायात जाम झिणझिण्या आल्या. पण अगदी क्षणभर च. नंतर पुन्हा आम्ही हवेत. वडील ओरडत होते. माझं बखोटं धरून गाडीवर बसवत होते. मी मात्र दाराकडे बघत होतो. ती बाहेर आली आणि आमची नजरानजर झाली. आम्ही एकमेकांना हात केले आणि मार्गस्थ झालो भविष्याकडे.
वेळेचं चक्र फिरलं. मी मोठा झालो. ती ही मोठी झालीच असणार. नंतरची दोन-तीन वर्षं तिच्या फोन ची मी वाट बघितली. नंतर आमचा landline बंद झाला. आणि माझ्या मनातला तिचा कप्पा सुद्धा.
काल आयुष्याच्या या वळणावर ती पुन्हा एकदा सामोरी आली. निमित्त होतं वडिलांच्या यत्ता दहावीच्या वर्गाचं GetToGether. आपणहून आपली आणि आपल्या परिवाराची ओळख करून द्यायचा कार्यक्रम सुरु झाला आणि ती, तिची आई, तिचे बाबा आणि भाऊ असा त्यांचा चौकोनी परिवार समोर येऊन उभा ठाकला. ओळख करून देताना त्यांनी आपली नावं सांगितली खरी पण मी मात्र ही कोण ? हिला कुठेतरी बघितलंय या विचारात गुंतलेलो. नंतर मग कार्यक्रमात काय आपलं लक्ष लागलं नाही. केवळ खाण्यासाठी जगणाऱ्या मला समोरचं ताट नकोसं झालं. सगळं आटोपून निवांत होऊन खुर्चीवर बसलेलो असताना मागून रामू…रामू…रामू म्हणून हाक आली आणि मी पुन्हा चौथीत गेलो. आमच्या बाईंनी चौथीत बालनाट्य बसवलं होतं आणि त्यात मी रामू नोकराची भूमिका साकारली होती. माझं नाटक व्यवस्थित सुरु होतं. Dialogues आणि जागा अगदी अचूक चालल्या होत्या. आणि अचानक शाळेची लाईट गेली. रंगमंच आणि प्रेक्षकवर्ग दोन्ही अंधारात गुडूप झाले. आणि एकदम टॉर्च चा उजेड रंगमंचावर फिरून माझ्यावर येऊन स्थिरावला. त्या टॉर्चच्या मागे कोण आहे या उत्सुकतेत मी रंगमंचाच्या पुढे पुढे सरकत होतो. रंगमंच संपून मी दाणकन खाली आदळलो. त्या टॉर्चच्या मागे असलेला हात मला सावरण्यासाठी पुढे आला. तो हात हातात आला आणि एकदम लाईट आले. माझ्या नाटकातून अनपेक्षितपणे माझी Exit झाली होती. आणि रंगमंचाच्या खाली एक निराळाच प्रयोग आकार घेत होता. आमच्या देशपांडे बाईंनी पाठीत घातलेल्या धपाट्याने मी भानावर आलो आणि प्रमुख पाहुण्यांच्या गर्दीतून पळत जाऊन रंगमंचावर दाखल झालो. पुढचा dialogue आठवत नव्हता. एवढ्यात मला विंगेतून माझे dialouges ऐकू आले. आणि मी पुढचं नाटक पार पाडलं.
त्या दिवशी मी घेतलेला तो शेवटचा प्रॉम्प्ट होता. नंतर ती वेळ आली नाही. संबंध शाळा मला त्यादिवसापासून “राम्या” या टोपणनावाने ओळखू लागली. “रामू” ही हाक यायची ती फक्त एकाच मुखातून. टॉर्च च्या मागे असलेल्या हाताच्या मालकिणीकडून.
त्यामुळे आता “रामू” या नावाचा त्रिवार घोष कानी पडताच मी मागे वळून बघितलं तर तिथे तीच उभी होती. गेल्या १७-१८ वर्षांचा काळ जणू मागे पडला होता. ती आणि मी पुन्हा चौथीत गेलो होतो. पुन्हा एकदा रंगमंचावर रामू नोकर उभा होता. पुन्हा एकदा लाईट जाणार हे निश्चित होतं. पुन्हा एकदा रामू नोकराला आणि त्याच्या पडलेल्या नाटकाला सावरण्यासाठी टॉर्च घेतलेला हात तयार होता.
Finally नियतीनं आपलं वर्तूळ पूर्ण केलं होतं आणि आता नियती सिद्ध झाली होती यापुढचा अध्याय लिहिण्यासाठी.